'कलियुग' वेळीच सावध व्हा !


    आपल्या भोवतालची सध्य परिस्थिती पाहता खरचं असे वाटु लागले आहे की, 'कलियुग'  यायला फार वेळ लागणार नाही. आपण पुर्वीच्या अनेक कथांमधुन हे ऐकलं, वाचलं असेल की, देवी देवतांनी अशी भविष्यवाणी करुन ठेवली आहे. या पृथ्वीतलावर जेव्हा पाप वाढेल, तेव्हा कलियुग आलेले असेल व पृथ्वीचा विनाष होण्यास वेळ लागणार नाही. आता तुम्ही म्हणाल, मी हा संदर्भ इथे का देते ? खरं तर आपण सध्या ज्या वातावरणात जगत आहोत यापेक्षा वाईट अजुन काय होऊ शकतं? आपण सगळेच अनुभव घेत आहोत. गेल्या वर्षभरापासुन कोरोना विषाणु संसर्गाने संपुर्ण जगभरात थैमान घातले आहे. मृत्युचे तांडव हे चालुच आहे. हे सारं काही चालु असतानाचं आता देशभरात ऑक्सिजन तुटवडा भासू लागला आहे. अनेक ठिकाणांहुन मदत मागवली जात आहे. ऑक्सिजन अभावी कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

आपण सोशल मिडियावर वायरल झालेली एक पोस्ट पाहिली असेलंच की, "जेव्हा काही वर्षांपुर्वी पाण्याची विक्री चालु झाली. तेव्हा याबाबत मस्करी केली गेली, थट्टा उडवली आणि आज प्राणवायुसाठी पैसा द्यावा लागतो."  आपण आजपर्यंत कितीतरी पैसा पाण्याकरिता पाण्यासारखा खर्च केला. मात्र, तरी देखील अनेक परिसरांमध्ये पाणीटंचाई हा प्रश्न आहेच. यातच आता मानव जातीसमोर उभा येऊन ठेपलेला गंभीर प्रश्न म्हणजे "प्राणवायुचा तुटवडा ". आज जगभरात प्राणवायुच्या तुटवड्यामुळे कित्येक लोक मरण पावले आहेत. अनेक ठिकाणची आरोग्य यंत्रणा ही कोलमडुन गेली आहे. भारतात लोकसंख्येच्या प्रमाणात डॅाक्टर व परिचारिकांचे प्रमाण हे जागतिक आरोग्य संघटनेने नेमुन दिलेल्या किमान पातळीच्या मागे- पुढे आहे. याचाच अर्थ आपले वैद्यकिय मनुष्यबळ हे जेमतेम पुरेल इतके आहे. अनेक सुविधा अपुऱ्या पडत चालल्या आहेत. भारताची लोकसंख्या १३८ कोटी इतकी प्रचंड आहे. एका अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार सध्याच्या परिस्थितीला आणीबाणीच्या वेळी आपण १५०० रुग्णालय उपलब्ध करु शकतो.

मात्र, वैद्यकीय मनुष्यबळाची कमतरता ही तशीच असेल. या सणाच्या परिस्थितीमध्ये कोणत्या सरकारला किंवा पक्षाला दोष देण्यात अर्थ नाही. मात्र तरीदेखील प्रत्येक राजकीय पक्ष हे स्वतःची पोळी यातही बरोबर कशी भाजून घ्यायची हे बघत आहेतचं. राजकारण आणि राजकीय नेते मंडळी याबाबत काय बोलावं ? आता सर्वसामान्यांना देखील सत्य व असत्याची जाणीव होऊ लागली आहे. एकीकडे आरोग्य यंत्रणा ढासाळताना दिसते, तर एकीकडे भ्रष्टाचार वाढताना दिसतो. काहींचे खीसे भरत चालले आहेत तर काहींना दोन वेळचं अन्न सुद्धा मिळणं कठीण होऊन बसलं आहे. लॉकडाऊन लागल्यानंतर कित्येक कुटुंब उध्वस्त झाले. अनेकांचे रोजगार बंद झाले, २०२० मध्ये लॉकडाऊनमुळे जे हाल झाले, यापेक्षाही भयंकर परिस्थितीला लोक सध्या सामोरे जात आहेत.

वृत्तवाहिन्यांनी मधून अनेक काळाबाजार घडलेला देखील समोर आला. अनेक मंत्र्यांचे देखील याच नावे घेतली गेली. हा सगळा प्रकार कलियुग आल्याचे भासवतो. मानवाने निसर्गाला इजा केली, मानवाने मानवाला देखील इजा केली. आता मात्र निसर्ग मानवाला त्याची परतफेड करून देत आहे. ज्वालामुखी,अनेक देशांमध्ये जंगलाला लागणारा वनवा, वाढते तापमान, महापूर, अवकाळी पाऊस, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. निसर्गचक्राचा समतोल बिघडल्याने आज संपूर्ण मानव जातीवर ही परिस्थिती उद्भवली आहे. आपल्या लहानपणी शाळेतील पुस्तकात पाठीवर ऑक्सिजन लावून असणाऱ्या एका माणसाचे चित्र होते. ती परिस्थिती आपल्यावर यायला वेळ लागणार नाही. अजुनही वेळ गेली नाही. या निसर्गाने मानवाला खूप काही दिले आहे. आपल्या निसर्गाला वाचवण्याची हीच ती वेळ आहे. प्लास्टिकचा वापर बंद करणे, विनाकारण खाजगी वाहतुकीचा वापर करणे टाळले पाहिजे. आपण प्रत्येकाने स्वतःला ऑक्सिजन मिळावा या विचाराने तरी एक झाड लावलं पाहिजे व ते जगवले पाहिजे. येणाऱ्या नैसर्गिक व मानवाने उद्भवून आणणाऱ्या कलियुगातून वाचायचे असेल तर वेळीच सावध होणं यातच शहाणपण!

- रामेश्वरी आहेर 

Comments

Post a Comment